#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क (६/९/२५)
#समानब्लॉगटास्क
#कथालेखन
#रमाई_नंदनवन
सूचना: साइट वर ही कथा पोस्ट करण्यात आली आहे. खालील लिंक वर जाऊन वाचा आणि लाइक कमेंट नक्की करा.
***** रमाई नंदनवन *****
🌹🌱🌷🌷🌱🌱🌷🌷🌱🌹
💚 भाग १ .. 💚
————————–
आनंदावर दुःखाची सावली :
लेखिका : स्वाती येवले
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
रमेशच्या मागे त्याची आई हात धुवून लागलेली की काही मुलींचे फोटो आहेत , बघून घे ..आता लग्नाचं वय झालं ना तुझं .. पण रमेश काही दाद देत नव्हता .. कारण त्याने ठरवलेलं, लग्न करेल तर जुई बरोबरच ..जुई रमेश एकाच कॉलेज मध्ये शिकत होते ..तेव्हापासून त्यांच्यात प्रेम झालं.. जुई एकदम बिनधास्त , बडबडी , हुशार ,प्रेमळ आणि गोड मुलगी ..रमेश हुशार, थोडासा लाजाळू ,शांत ,अबोल मुलगा .. पण तरी पूर्ण कॉलेज मध्ये त्यांना मेड फॉर इच अदर म्हणायचे कारण दोघांचं एकमेकांपासून पान ही हलायच नाही ..दोघे सतत बरोबर असायचे ..कॉलेज संपलं, दोघांनाही छान नोकऱ्या मिळाल्या मग लग्नासाठी जुई चे आई वडील तिच्या मागे लागले ..जुई ने रमेश शी ओळख करून दिली आणि लग्न करेल ते ह्याच्याशीच सांगून मोकळी झाली .. जुई च्या आई वडिलांनी होकार दिला कारण जुई ने एकदा ठरवलं ते ठरवलं तिला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांना ही माहित होत ..
पण रमेश ने जेव्हा त्याच्या घरात सांगितलं तेव्हा रमेश चे आई वडील तयार नव्हते कारण त्यांना त्यांच्याच जातीची मुलगी हवी होती … एकदा जुई त्यांना डायरेक्ट जाऊन भेटली आणि म्हणाली, “अहो कसली जात पात धरून बसता?तुम्ही परवानगी द्या नाहीतर आम्ही आमचं आमचं लग्न करून घेऊ .. ” जुई च्या ह्याच बिनधास्तपणा वर तर रमेश फिदा होता…शेवटी एकदाचे रमेशचे आई वडील तयार झालेत ..
लग्न करून जुई रमेश च्या घरी आली .. रमेश च्या आईला तर भीतीच वाटत होती की ह्या फटाकडी सुनेबरोबर तिचा कसा निभाव लागला .. पण जुई जितकी फटाकडी ,बिनधास्त होती तितकीच ती खूप प्रेमळ होती आणि मुख्य म्हणजे रमेश आई वडिलांचा एकुलता एक मुलगा , अतिशय साधा सरळ प्रामाणिक मुलगा तर तो कधीच तिच्या कुठल्या वागण्याने दुखावला जाणार नाही ह्याची ती कायम काळजी घ्यायची .. त्यामुळे दुधात साखर विरघळते तशी जुई त्यांच्या घरात फारच कमी कालावधीत एकरूप झाली .. रमेश पेक्षा ही जास्त तिची चिवचिव , त्याच्या आई बाबांना ‘आई बाबा ‘ अशी सतत हाक मारून त्यांच्या प्रत्येक कामात सामील होणं त्यामुळे अगदी कमी कालावधीत ती त्यांची लाडकी सून नाही तर मुलगी च झाली ..
रमेश खुश होता ,आई वडील जुई हेच तर त्याच विश्व ..आणि इमाने इतबारे नोकरी करणं .. लाईफ कस छान सेट झालेलं उलट आता कुटुंब वाढवूया असा ही विचार त्याच्या मनात आला .. जुई ला त्याने त्याबद्दल सांगितलं ..
जुई अर्थातच रमेश च्या शब्दाबाहेर नव्हती .. पण त्यांनंतर एक वर्ष गेलं, दोन वर्ष गेलीत पण जुई ला दिवस जात नव्हते .. जुई ला पाळी आली की जुई पेक्षा जास्त रमेश ला त्याच दुःख व्हायचं ..
शेवटी दोघे मेडिकल चेकअप साठी गेले ..पूर्ण तपासण्या केल्या आणि दोष रमेश मधे आहे असं डॉक्टर म्हणाले , रमेश कधीच बाप होणार नाही ,त्यासाठी लागणारे शुक्राणू नाही आहेत ..
रमेश खचला .. अगदी निराशेच्या गर्तेत गेला . जुई ने त्याला पुष्कळ समजावून सांगितलं की अरे मेडिकल सायन्स इतकं अँडव्हान्स झालं आहे की आपण आय वी एफ साठी जावू ,ते ही शक्य नाही झालं तर मुल दत्तक घेऊ .. हे कारण नाही निराश होण्याचं .. नवरा बायको नात्यात दोष त्याचा असो किंवा तिचा तो त्या दोघांचा ही असतो कारण नवरा बायको मुळात दोन नसतातच,शरीर जरी दोन असले तरी मनाने ते एकच असतात..त्यामुळे जे त्याच ते तीच ..आणि माझ्यात दोष आला असता तर तू सोडलं असत का मला ..
पण रमेश च्या डोक्यात सतत तेच विचार ,परिणामी नोकरी वर परिणाम झाला ,कामात चुका व्हायला लागल्या आणि होत्याचं नव्हतं झालं ..त्याच्या हातून नकळतपणे झालेल्या एका चुकीने त्याला नोकरी तर गमवावी लागली पण शिक्षा म्हणून कंपनी मालकाने दोन लाख रुपये ची मागणी केली ,नाहीतर उगाच पोलिस स्टेशन ,न्यायालयीन लढाई साठी तयार हो सांगितलं .. प्रकरण वाढू नये म्हणून घरच्यांनी दोन लाख देऊन विषय संपवला..
पण खरा विषय तिथेच सुरू झाला ..ह्या प्रकरणामुळे रमेश डिप्रेशन मध्ये गेला ..
रमेश च्या आई वडिलांनी , जुई ने त्याला खूप समजावून सांगितले .. रमेश चे आई वडील तर सेवानिवृत शिक्षक. ते त्याला ते सांगायचे की आयुष्य म्हणजे एक युद्धभूमी आहे त्यात लढायचं असतं , रडायचं नसतं .. प्रसंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात .. अरे , राम सीता देव असून मनुष्यरुपात जन्माला आलेत तर त्यांना वनवास चुकला नाही .. नोकरी गेली म्हणून काय झालं आपण काहीतरी स्वतःच सुरू करूया ,आम्ही आहोत तुझ्या मदतीला , तुला तुझ्या क्षेत्रात स्वतःच सुरू करायचं नसेल तर आपण एखाद दुकान काढू ..पण त्यात ही त्याला कमीपणा वाटला.. उलट तो अजून चिडला म्हणजे मी शिक्षण त्यासाठी घेतलं का कांदे बटाटे विकायला … बाबांनी त्याला सांगितलं की अरे कुठलाही धंदा कमी नसतो , माझ्या मित्राचा मुलगा आयटी इंजिनियर झाला , काही दिवस जॉब केला पण नंतर कांद्याचा एक्सपोर्ट धंदा सुरू केला .. आई म्हणाली , माझ्या एका मैत्रिणीची सूनने मेस सुरू केली आणि स्वतःच्या हिमतीवर फ्लॅट घेतला .. त्यामुळे तू कुठलाही धंदा सुरू कर आम्ही आहोत मदतीला .. आम्हाला पेन्शन ही मिळत आहे त्यामुळे तू फक्त खुश रहा आणि एखाद्या कामात व्यस्त रहा कारण रिकाम डोक सैतानाच खोक..
जुई ने त्याला कितीतरी सकारात्मक पुस्तक वाचायला आणून दिली पॉवर ऑफ माईंड, द सिक्रेट, पॉझिटिव्ह थिंकिंग..तिने ही त्याला सांगितलं की अरे पुरुषार्थ हा फक्त मुलाला जन्म देण्यात नसतो तर आलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्यामध्ये असतो , लाथ मारेल तिथे पाणी काढणारा माझा पूर्वीचा रमेश मला परत दे रे.. तू तुला शोध , तुझ्यातला तू हरवला आहेस त्याला तू शोध ..
डॉक्टर म्हणाले की नैराश्य ही खूप मोठी समस्या आहे त्यामुळे त्याला बोलतं ठेवत रहा , त्याच्याशी संवाद साधत राहा , त्याला एकटं सोडू नका .. संवाद साधायला गेल तरी तो प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ घ्यायचा , इतक की त्याला हे ही वाटायला लागलं की त्याच्या आई वडिलांचं त्याच्यापेक्षा जास्त जुई वर प्रेम आहे ..
आणि शेवटी तो क्षण आला , ज्यामुळे जुई आणि त्याच्या आईवडिलावर आभाळ कोसळलं .. एकदिवस जुई तिच्या ऑफिस मध्ये असताना ,आई किचनमध्ये , बाबा बाहेर हॉल मधे असताना रमेश ने त्याच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि गळफास लावून घेतला फक्त एक वाक्याची चिठ्ठी ठेवून , ” जुई , सॉरी, मी हरलो , माझ्या आई बाबांचा सांभाळ कर .”
💚 भाग २ .. 💚
————————–
आनंदी जीवनाचा मार्ग :
लेखिका : मनिषा चंद्रिकापुरे
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
रणदिवे कुटुंबार दुःखाचा पर्वत कोसळला.. नैराश्याच्या गर्तेत जाऊन रमेशने पराकोटीचा निर्णय घेतला.. स्वतःत असलेल्या दोषामुळे तो पूर्णपणे खचला होता.. पण आपण बाप होऊ शकत नाही या एका दोषामुळे इतकं हतबल होणं, त्यावर जुईने सुचवलं त्या दृष्टीने प्रयत्न करण्यापेक्षा निराशेच्या गर्तेत जाऊन स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची अशी शोचनीय अवस्था करणं योग्य नव्हे. पण तो आलेल्या परिस्थितीसमोर हतबल झालेला..
रमेशचे आई वडील पार खचून गेले. मुलाला वाढवताना, घडवताना त्यांच्या मनाला स्वप्नातही हा विचार शिवाला नसेल की तो इतक टोकाचं वागेल, परिस्थितीसमोर हतबल होऊन असा सोडून जाईल. त्यांची शिकवण कमी पडली असेल, आपण त्याला समजून नाही घेऊ शकलो, डॉक्टरांनी त्याला बोलतं ठेवा असं सांगूनही आपण त्याला एकटं का सोडलं .. असे नाना विचार त्यांच्या मनात येऊन गेले.
जुईचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. रमेश तिचं सर्वस्व होता. कॉलेज मध्ये असताना दोघांनी आपल्या सुखी संसाराची किती स्वप्न बघितली होती.. आता कुठे त्यांच्या संसाराची सुरुवात झालेली .. आणि अर्ध्या रस्त्यावर तिला सोडून, आपल्या आईवडिलांचा आधार बनण्याऐवजी तिच्यावर त्यांची जबाबदारी सोडून तो कायमचा जगला रामराम करून निघून गेला. ती पण पूर्ण खचून गेली होती. पण तिला त्याचे शब्द आठवले .. “माझ्या आई वडिलांची काळजी घे” .. सासू सासऱ्यांना आधार देणं, आपलं दुःख दूर सारून त्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यातून त्यांना बाहेर काढणं तिचं कर्तव्य होतं.
तशी ती धाडसी वृत्तीची, परखड आणि करारी होतीच. तिने स्वतः सावरलं. सासू सासऱ्यांनाही सावरलं. त्याची सर्वतोपरी काळजी घेऊ लागली. तिला नौकरीवर जाणं भाग होतं.
रमेशला जाऊन आता तीन वर्ष उलटून गेले. तिच्या आई वडिलांनी, मैत्रिणींनी, ऑफिस मधील सहकाऱ्यांनी तिला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. पण रमेशला विसरण तिला शक्य नव्हतं. शिवाय त्याच्या आई वडिलांची संपूर्ण जबाबदारी तिचीच होती. त्यामुळे तिने दुसऱ्या लग्नाचा विचार मनातही येऊ दिला नाही. घर, ऑफिस सांभाळत, येणारे संकट पार करत आला दिवस पुढे ढकलत होती. आनंद तिच्या जीवनात उरलाच नव्हता. एक मशीन झाली होती ती.. ठरल्या वेळी ठरल्या गोष्टी पूर्ण करणारी ..
मुलाच्या दुःखामुळे तिच्या सासू सासऱ्यांचे स्वास्थ्य फार बिघडत रहायचे. त्याचं रेगुलर चेकअप, औषधपाणी, पथ्य सारं यथायोग्य पाळत होती. मधे तिच्या सासूला हृदयविकाराचा झटका येऊन गेला आणि एका महिन्याच्या आतच ती ही देवाघरी निघून गेली. आता मात्र ती फार एकटी पडली. सासरे होते पण तेही वयोवृध्द.. ते तरी तिला कुठपर्यंत पुरणार. दोघेही आता एकमेकांचा आधार होते. सासरे आहेत तोपर्यंत ठीक .. पण पुढे काय .. एकटीने जीवन जगणं असह्य असतं .. त्यात मनात घर करून असलेल्या रमेशच्या आठवणी .. तिच्या मनात येऊन गेलं .. एखादं मूल दत्तक घ्यावं. तिने दोन तीन अनाथाश्रमात जाऊन चौकशीही केली.
अशातच तिने टिव्ही वर सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील चित्रपट बघितला. आपली परिस्थिती तर त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगली आहे ही जाणीव हा सिनेमा बघून तिला झाली. अशाही परिस्थितीत त्या किती खंबीरपणाने उभ्या राहिल्या, अनाथांची माई झाल्या .. हे बघून तिलाही त्यांच्यासारखं होण्याची इच्छा जागृत झाली.
आता तिने मनाशी पक्का निर्णय घेतला. एक मूल दत्तक घेण्यापेक्षा आपणही अनाथाश्रम काढून अनेक अनाथ मुलांचं भविष्य घडवावं. तिने आपली ही इच्छा आपल्या सासऱ्यांपुढे बोलून दाखवली. जुईने घेतलेल्या प्रत्येक निर्णयात ते तिच्या बाबांप्रमाणेच तिच्या पाठीशी असायचे. आणि आतापर्यंत तिचा प्रत्येक निर्णय योग्यच ठरला होता. त्यामुळे त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. अशातच एके दिवशी तिने पेपरमध्ये बातमी बघितली .. एका कार अपघातात नवरा बायको दोघांचेही निधन .. दोन कोवळी मुलं अनाथ .. बातमीसोबत त्या मुलांचे फोटो पण होते. दोन वर्षाची मुलगी आणि तिचा पाच वर्षाचा भाऊ .. निरागस, भाबडी, निर्व्याज मुले .. दिसायला सुंदर, गोरीपान .. आणि पुढे आवाहन करून लिहिलं होतं.. कुणी यांना दत्तक घ्यायला पुढे येईल का .. ज्यांची इच्छा असेल त्यांनी पोलिस स्टेशन मध्ये संपर्क करावा.. खाली मोबाईल नंबर दिलेला. तातडीने तिने कॉल केला आणि पोलिस स्टेशन गाठले .. रीतसर दोघांनाही सध्या तरी दत्तक घेतलं .. आणि पोलिसांना ही सांगितलं की ती अनाथाश्रम सुरू करण्याच्या विचारात आहे .. पुढे तुमची मदत लागेलच .. कुठे अनाथ मुलं आढळली तर संपर्क करा म्हणत तिने त्यांना आपला मोबाईल नंबरही तिला.
आता तिच्या कार्याला गती आली. सासऱ्यांनीही मदत केली. मुलांना घरी ठेवून ती ऑफिस ला जायची तेव्हा तेच मुलांची काळजी घ्यायचे. नातवंडांशी खेळण्याची त्यांची इच्छा पूर्ण होत होती. त्यांच्या सोबत वेळ घालवण्यात त्यांच्या प्रकृतीत ही सुधारणा होऊ लागली. अनाथाश्रमाचं काम जसं वाढत गेलं तसं ऑफिस सांभाळणं कठीण व्हायला लागलं. त्यामुळे तिने जॉब सोडला. पूर्ण वेळ अनाथाश्रमाचं काम बघू लागली. मुलांमध्ये रमू लागली. त्यांच्या भवितव्यासाठी सर्वतोपरी झटू लागली .. त्या निरागस मुलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करणं हेच तिचं ध्येय होतं.
आता अनाथाश्रम सुरू करून पाच वर्ष होऊन गेली. सासरेही वारले… पण आता ती एकटी नव्हती .. तिच्यात हत्तीच बळ आलं होतं .. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ती सबळ झाली होती. हजारो मुलांचं भवितव्य तिला घडवायचं होतं. अनेक खाजगी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, व्यावसायिक इत्यादी तिच्या ‘रमाई’ या अनाथाश्रमाला देणग्या देत असत. सरकारचही फंड मिळायचं. या मुलांमध्ये ती स्वतःचीच मुलं शोधायची. सगळ्यांना तिने आईच प्रेम दिलं, माया केली. अनाथाश्रमाच्या कार्यालयात समोरच रमेश चा फोटो लावला होता. आज अनाथाश्रमाचा पाचवा वर्धापनदिन दिन होता. वर्धापनदिन साजरा झाल्यानंतर रमेश च्या फोटोसमोर उभी राहून ती बोलू लागली .. “बघ रमेश .. तुला बाळ होऊ शकणार नाही म्हणून तू दुःखी होतास .. आपल्याला कुणी बाबा म्हणणार नाही याचं शल्य तुझ्या मनात होतं .. त्यामुळे तू हार पत्करून सोडून गेलास .. पण हे बघ .. तुला एक नाही .. इतकी मुलं आहेत. हजारो मुलांचा तू बाबा आहेस आता .. म्हणूनच मी आपल्या अनाथाश्रमाला नाव दिलं .. “रमाई (रमेश + जुई) – नंदनवन” .. हे आपल्या स्वप्नांचं नंदनवनच आहे..”
—- समाप्त —-
©️®️ सौ. स्वाती येवले आणि मनिषा चंद्रिकापुरे
(६/९/२५)


सुंदर कथा 👌👌
Thank u
**mitolyn reviews**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.