जबाबदारी आपलीच

inbound1398060918762129173.jpg

#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (१५/८/२५)
#आऊटिंगआणिस्वातंत्र्यदिन
#जबाबदारीआपलीच

निशा, आशा आणि उषा ह्या त्रयींनी स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सुट्टीचं औचित्य साधून दोन दिवस मुंबईबाहेर जाण्याचं ठरवलं. त्यांनी विभाला पण आग्रह केला. तिला राजी करण्यासाठी तिघी तिच्या घरी आल्या. विभाने स्पष्ट नकार दिला. ती त्यांना समजावत म्हणाली,
“आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी मागचा पुढचा विचार न करता प्राणांची आहुती दिली. हा दिवस आपल्या तिरंग्याचा मान राखून सर्वांनी एकत्र साजरा करण्याचा आहे. शाळेत आपण सर्वच किती जोषपूर्ण भाषणं करतो, देशभक्तीपर गीतं गातो. मोठं झाल्यावर आपण तिरंग्याला डावलून ह्या सुट्टीचा गैरवापर करतो. आज आपणच असे वागलो तर पुढच्या पिढीला स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व कसं कळणार. त्यांना वाटणार ही सुट्टी इतर सुट्ट्यांसारखीच आहे. कित्येक जण सुट्टी म्हणून आरामात उठतात, कुठेतरी फिरायला जातात. हे कितपत योग्य आहे. माझे आई बाबा आणि मी सोसायटीतील सदस्यांबरोबर हा दिवस साजरा करतो.” तिघींना विभाचं म्हणणं पटलं आणि त्या एका सुरात बोलल्या,

“विभा आज तू आमच्या डोळ्यात अंजन घातलंस.”

©️®️सीमा गंगाधरे

2 Comments

  1. स्वातंत्र्याचं सुराज्य करायचं तर जबाबदारी ची जाणीव हवीच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!