खेळ नियतीचा

#खेळ नियतीचा

सानिका आणि सलीलचा संसाररथ विश्वासाच्या रुळावरून आता अव्याहत चालू होता. तो आता असाच सुकर मार्गावरून चालणार याची दोघांनाही खात्री होती. पल्लवी कडे सानिका आणि सलील एकटक पाहत होते. दोघांचीही मने एकाच दिशेने धावत होती. आज पल्लवी मुळे त्यांच्या जीवनात अत्युच्च आनंद होता. खूपच खुश होते दोघे. सानिकाचे विचारचक्र सुरू होते. मधला काळ असा होता की दोघांमध्ये वैचारिक मतभेदांमुळे अंतर आले होते. पण त्या आधी दोघांचे एकमेकांशिवाय पानही हलत नव्हते.
नकळत सानिकाचे मन भूतकाळात शिरले. सानिका आई बाबांची एकुलती एक लेक लाडाकोडात वाढलेली. बालपण खूप छान गेले होते. कॉलेज विश्व अगदी स्वप्नमय होते. ठरवल्या प्रमाणे खूप चांगल्या मार्क्सनी कॉम्प्युटर इंजिनिअर झाली. यथावकाश एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली. आई बाबा आणि ती खूप खुश होते. आयुष्य कसे मोरपंखी होते. त्या कंपनीतच सनिकाची ओळख सलीलशी झाली. तो तिला दोन वर्ष सीनिअर होता. सलील परराज्यातला होता. मुंबईत आल्यामुळे तो मराठीत अस्खलित बोलायचा.एकत्र काम करता करता ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले दोघांनाही कळले नाही. एक दिवस दोघंच असताना सलील सानिकाची गंमत करत म्हणाला,
“माझ्या आईला माझ्या लग्नाची खूप घाई झाली आहे. तिने गावात मुली पाहायला सुरुवात केली आहे.” सानिका गोरीमोरी झाली. सलीलच्या ते लक्षात आलं.

“काय झालं तुझा चेहरा असा काय झाला तुला बरं वाटत नाही का.” शेवटी सलीलला जे हवं होतं ते सानिका बोललीच.

“तू खरंच गावातल्या मुलीशी लग्न करणार! मला तू खूप आवडतोस आणि माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.”

“वेडाबाई हेच तर ऐकायचं होतं मला.” सानिका लटक्या रागाने म्हणाली,

“मला सतवायला तुला खूप मजा येते का रे?” सलील गालातल्या गालात हसला. सानिकासारखी मध्यम उंचीची, गव्हाळ वर्णाची,तरतरीत नाकाची आणि काळेभोर डोळे असलेली सुंदर तरुणी आपल्या आयुष्यात असल्यामुळे सलील खूपच आनंदित होता. सलीलसुद्धा पुरूषी सौंदर्याच्या व्याख्येत बसणारा होता. पावणेसहा फूट उंची, सावळा वर्ण, कुरळे केस एकदम रुबाबदार व्यक्तिमत्व. प्रेमाची कबुली दिल्यावर दोघांच्या वरचेवर भेटीगाठी होत होत्या. दोघे एकत्र असले की वेळ कसा कापरासारखा निघून जायचा त्यांना कळतही नव्हतं. मोरपंखी दिवस होते त्यांचे.
सलील कधीकधी सानिकाच्या घरी येत होता. त्यामुळे तिच्या आई बाबांशी त्याची ओळख झाली होती. दोघे चांगले मित्र असण्यास तिच्या आई बाबांचा विरोध नव्हता. सलील मित्रांबरोबर घर शेअर करून राहत होता. त्या दोघांनी बऱ्याच विचारांती ठरवले की आता आपण लग्न करावयास हवे. त्यांना वाटले दोघांचेही आई वडील शिकलेले, समाजात वावरलेले आहेत म्हणजे आपलं लग्न त्यांना मान्य होईल. पण सगळं सुरळीत झालं तर बघायलाच नको. दोघांनीही योग्य वेळ बघून आपापल्या घरी सांगितलं. दोन्ही घरी मोठा स्फोट झाला. दोघांच्याही घरून कडाडून विरोध झाला. सलीलच्या आईने तर मौनव्रत धारण केलं.
“अगं मला आपल्या जातीतलाच मुलगा हवा असं नाही पण कमीत कमी महाराष्ट्रीयन तरी असावा असा मला वाटतं.” सानिकाची आई करवादली.
सानिका सलीलला सुचत नव्हते काय करावं. बरं आई बाबांना दुखवून लग्न करण्याची दोघांचीही तयारी नव्हती . सानिका घरी खूप उदास राहू लागली. हसती खेळकर मुलगी एकदम मितभाषी झाली. आई बाबांना तिची ही अवस्था बघवेना. इकडे सलील पण खूपच उदास राहत होता. शेवटी एक दिवस सानिकाच्या आईने सलीलचा फोन नंबर घेतला आणि त्याला सांगितले की तुझ्या आई बाबांना घेवून तू आमच्याकडे ये. त्याने त्याच्या आई बाबांना हा निरोप सांगितला. सुरुवातीला त्याची आई मानायलाच तयार नव्हती. मला मुंबईची सून नकोच आहे. मला आपल्या गावातील मुलगी सून म्हणून हवी आहे. शेवटी एकदाची कशीबशी ती तयार झाली.

दोघांचे आई बाबा एकमेकांशी बोलल्यावर एका सुमुहूर्तावर सानिका सलीलचे लग्न झाले. दोघे एकदम सातवे आस्मा पर होते. सलीलच्या आई बाबांनी सानिकाला आपल्या कुटुंबात सामावून घेतले. सलीलने मुंबईत छान फ्लॅट घेतला. दोन तीन महिन्यांनी त्याचे आई बाबा गावी निघून गेले. राजा राणीचा संसार सुरू झाला. काही दिवसांनी सलीलच्या आई बाबांनी पुजेसाठी म्हणून दोघांना गावी बोलावले. यथावकाश पूजा आटोपल्यावर दोघे मुंबईला यायला निघाले. तेव्हा सलीलची आई म्हणाली,

“सूनबाई आता इथेच राहील. तू एकटाच मुंबईला जा.” दोघेही अवाक् झाली. लग्नाआधी आई असे काहीच बोलली नाही . आईला वाटत होते की सुनेने नोकरी न करता आपल्या बरोबर राहून शेतीच्या कामात लक्ष घालावे. सानिका एकदम सुन्न झाली. ती म्हणाली,

“आई मी एव्हढे शिक्षण घेतले आहे. मला शेतीच्या कामाची काहीच माहिती नाही. मी पण मुंबईला जाते.” सलीलच्या आईमधली सासू जागृत झाली. शेवटी सलील सानिकाला म्हणाला,

“तू काही दिवस रहा इकडे. फार तर तुझी बिनपगारी रजा होईल. आई थोडी शांत झाली की तू मुंबईला ये. आई असं वागेल याची मलाही कल्पना नव्हती. तुझ्याशिवाय मला सुद्धा मुंबईला अजिबात करमणार नाही गं!”

काही दिवसांनी सानिकाने मुंबईला जायचा विषय काढला तर आई काही ऐकेना. तशी सानिका सलीलला म्हणाली,

“सासुबाई मला तिथे येवू देत नाहीत तर तू तरी इथे ये. आपण दोघे मिळून इथेच काहीतरी करू. मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही.”

प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या, एकत्र राहण्याची स्वप्न बघितलेल्या सलीलने चक्क नाही म्हटले. तो अधिकारवाणीने सानिकाला म्हणाला,

” तू माझ्या आई बाबांबरोबर रहा मी अधून मधून येईन तिकडे. मी आईच्या मना विरुद्ध काही करणार नाही.”

आता मात्र सानिका चिडली आणि एक दिवस तडकाफडकी आई बाबांच्या घरी निघून आली. तिचे आई बाबा काळजीत पडले. पण घडला प्रसंग कळल्यावर ते ठामपणे सानिकाच्या पाठीशी उभे राहिले. सानिका घरी आली तरी सलीलच्या आठवणीने ती उदास राहू लागली . सलीलची अवस्था पण काही वेगळी नव्हती. त्याला जाणवले की आपण सानिकाशिवाय जगूच शकत नाही. सहा महिने असेच गेले आणि सानिकाच्या आई बाबांनी तिला घटस्फोटाचा सल्ला दिला. ती खूप विचलित झाली. बाबा म्हणाले,

“अगं तुझं उभं आयुष्य जायचं आहे. तुझा एक शाळेतला मित्र त्या दिवशी घरी आला होता. त्याला खूप वाईट वाटले. तुझ्याबद्दल ऐकून तो खूप हळहळला. बोलता बोलता तो मला म्हणाला की मी सानिकावर शाळे पासून प्रेम करतोय. तुमची परवानगी असेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे” .सानिकाने हे ऐकले आणि ती रडायलाच लागली. सलीलशिवाय दुसऱ्या कुणाचा ती विचारही करू शकत नव्हती. थोडे दिवसांनी तो मित्र सानिकाला भेटला. समजूतीच्या स्वरात तिला म्हणाला,

“अजुन किती काळ तू अशी राहणार आहेस. ज्या लग्नाला काही अर्थ नाही त्यातून मोकळी हो.” हो नाही करताना सानिका घटस्फोट घ्यायला तयार झाली कारण मधल्या काळात तिच्या बाबांना हृदय विकाराचा झटका येवून गेला. आपल्या काळजीने बाबांना त्रास होतोय हे तिला जाणवत होतं.

रीतसर घटस्फोटाची नोटीस सलीलकडे पाठवली गेली. सलील एकदम उध्वस्त झाला. तो हा विचार सहन करू शकत नव्हता. पण त्याच्या आईने घेतलेल्या टोकाच्या निर्णयापुढे त्याचे काही चालत नव्हते. खरं तर सलील आणि सानिकाचे एकमेकांवर खूप प्रेम होते. सर्व काही कागदपत्रं पूर्ण झाली आणि घटस्फोटासाठी जो वेगळं राहण्याचा कालावधी असतो तो पूर्ण झाल्यावर एक सही झाली की घटस्फोट. मनोमन प्रेम करणारे दोन जीव वेगळे होणार. शेवटी सलीलने सानिकाला फोन करून एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे ते दोघे भेटले. खूप महिन्यांनी समोरासमोर आल्यावर दोघांनी मिठी मारली. दोघांनाही स्पर्शातून जाणवलं की आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत. तसंही मनापासून दोघानाही एकमेकांपासून वेगळं राहायचं नव्हते. त्यांनी ठरवले की आपण आई बाबांशी बोलूया. सानिकाच्या आई बाबांचा प्रश्नच नव्हता. दोघेही सलीलच्या गावी गेले. सलीलच्या आई बाबांशी बोलले. सलीलची आई ऐकायला तयार नव्हती. त्याचे बाबा तिला म्हणाले,

“अगं आता आपलं काय राहिलंय. या दोघांकडे पूर्ण आयुष्य पडलं आहे. आपला मुलगा असा कुढत राहून सुखी होणार आहे का. तू त्याची अवस्था पाहिली आहेस ना. तू दोघांचा विचार कर.” सलीलचं आईवर खूप प्रेम होतं. तिचं मन वळवण्यासाठी तो म्हणाला,

“आई आम्ही विभक्त नाही राहू शकत. सानिका खूप चांगली मुलगी आहे आणि आमचा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आई तू काळजी करू नकोस आम्ही मध्ये मध्ये इथे येत जाऊ. कधी तुम्ही आमच्या कडे या. सानिका तुम्हाला तक्रारीला जागा ठेवणार नाही”. मधल्या काळात आईने सलील मधला बदल अनुभवला होता. शेवटी आपला मुलगा सुखी तर आपण सुखी हा विचार करून आईने त्यांच्या पुन्हा एकत्र येण्याला संमती दिली.

सानिका सलील चा घटस्फोट होता होता वाचला. दोन प्रेम करणारे जीव पुन्हा एकत्र येवून नव्याने संसाराला लागले आणि आता त्यांच्या संसार वेलीवर पल्लवीरुपी एक कळी उमलली. सलीलने सानिकाला विचारांच्या समाधीतून बाहेर आणलं आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. आज पल्लवीमुळे त्यांचे जीवन सुखाच्या लहरींवर तरंगत होते. नियतीने डाव टाकला होता परंतु ह्या खेळात त्यांच्या प्रेमाची सरशी झाली.

©️®️ सीमा गंगाधरे

ही कथा #स्टोरीकट्टा साठी आहे

12 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!